भूजलपातळी वाढविण्यासाठी पर्जन्यजलसंधारण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी केवळ ३% पाणीच पिण्याजोगे आहे. उर्वरित पाणी सारे खारट आहे. पिण्याच्या पाण्यापैकी ११% पाणी हे भूजलाच्या स्वरुपात आहे. हे पाणी जमिनीपासून सुमारे ८०० मीटरपर्यंत सापडते आणि ते पिण्यासाठी वापरता येते. भूजल हा अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान साठा आहे आणि बेजबाबदार वापरामुळेच त्याचे प्रमाण हळूहळू कमीकमी होत चालले आहे. भूजलसंवर्धनाच्या पद्धती नागरी विभाग ग्रामीण विभाग छपरांवरुन/ कौलांवरुन वाहून जाणारे पाणी साठवणे: संवर्धन खड्डा संवर्धन कालवा कूपनलिका संवर्धननलिका ओहोळवरील बांध समतल-रेखा बांध गॅबियन बांध पाझर तलाव नाला बांध संवर्धन पन्हाळे विहिरीतील संवर्धन भूजल / जमिनीखालील धरणे ग्रामीण भागांतील भूजलसंवर्धन ग्रामीण भागांत मुख्यत्वे पावसाचे पाणी जास्तीत जास्त क्षेत्रफळावरील जमिनीत मुरेल याकडे लक्ष दिले जाते कारण ग्रामीण भागात पाणी जिरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध असते. छपरांवरुन, उतारावरुन, नद्यांमधून आणि कालव्यांमधून वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी खालील पद्धती वापारता येतील. ओहोळावरील बांध - हे बांध स्थानिक दगड, चिकणमाती, आजूबाजूला असलेली झुडुपे वापरुन ओहोळ किंवा डोंगरउतारावरुन येणारे पाण्याचे झोत जमिनीत मुरविण्यासाठी वापरले जातात. यामुळे आजूबाजूच्या जमिनीचा कस आणि आर्द्रता वाढविण्यास मदत होते. अशा ओहोळांच्या प्रवाहात जेथे उतार कमी होऊन अडथळा निर्माण झालेला असतो तेथे असे बांध बांधता येतात. समान उंचीची ठिकाणे बांध घालून जोडणे जमिनीतील ओलावा दीर्घ काळ टिकवून ठेवण्यासाठी ही पद्धत फारच उपयोगी आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो अशा भागात ही पद्धत अत्यंत उपयोगी आहे. अशा भागात या पद्धतीद्वारे उतारावर समान उंचीची ठिकाणे बांध घालून जोडता येतात आणि पाणी अडविता येते. अशा दोन बांधामधील अंतर जमिनीचा उतार, क्षेत्र आणि तिची पाणी शोषण्याची क्षमता यावर ठरते. जमिनीची पाणी शोषण्याची क्षमता जेवढी कमी तेवढे बांधामधील अंतर कमी. जेथे उतार फारसा तीव्र नाही अशा ठिकाणी ही पद्धत उपयुक्त आहे. गॅबियन बंधारा हे बांध मुख्यत्वे लहान ओढ्यांभोवती बांधले जातात. त्यामुळे ओढ्यातील पाणी ओढ्यातच राहते आणि प्रवाहाबाहेर येत नाही. हा बांध जागेवरचेच दगडधोंडे वापरून तयार करता येतो. सर्वप्रथम स्टीलच्या तारांची जाळी तयार करून त्यात हे दगड भरले जातात. या बांधाची उंची साधारणतः ०.५ मी असते आणि ज्या प्रवाहाची रूंदी १० मी पेक्षा कमी असेल अशाच प्रवाहांना असे बांध वापरले जातात. या बांधात थोडे पाणी साठून रहाते आणि उरलेले पाणी बांधाबाहेर जाते. प्रवाहात वाहून आलेला गाळ कालांतराने बांधातील फटींमध्ये शिरून बांधातील फटी व छिद्रे बंद करून टाकतो त्यामुळे बांधातून पाणी गळणे बंद होते. शिवाय बांधाच्या आतल्या बाजूने वाढलेली झाडे पाऊस संपल्यावरदेखील पाणी वाहते ठेवण्यास मदत करतात. पाझर तलाव हे कृत्रिमरीत्या तयार केले जातात. सच्छिद्र जमिनीवर हे पाझर तलाव बांधले जातात जेणेकरून पावसाचे किंवा तलावात साठलेले पाणी जमिनीत मुरू शकेल, भूजल साठा वाढेल आणि आजूबाजूच्या विहिरींना, कूपनलिकांना पाणीपुरवठा होऊ शकेल. पाझर तलाव मुख्यत्वे दुस-या ते तिस-या दर्जाच्या प्रवाहांवर आणि अत्यंत सच्छिद्र व भेगा असणा-या जमिनीवर बांधले जातात. या तलावामुळे ओलिताखाली येणा-या क्षेत्रात पुरेशा विहिरी आणि सुपीक जमीन असली पाहिजे म्हणजे साठलेल्या भूजलाचा पुरेपूर वापर करता येईल. तलावाचे क्षेत्रफळ आणि आकारमान तलावाच्या जमिनीच्या सच्छिद्रपणावर अवलंबून असते. साधारणतः अशा तलावांची साठवण क्षमता ०.१ ते ०.५ MCM इतकी असते. पाझर तलाव हे मातीचा बंधारा घातलेले आणि दगडांनी बांधलेले असतात जेणेकरून पाण्याचा दबाव वाढल्यास बांध फोडुन पाणी वेळीच बाहेर पडू शकेल. पाझर तलावांचा मुख्य उद्देश आहे पाणी जमिनीत मुरवणे आणि भूजल पातळी वाढवणे. ४.५ मी उंची पर्यंतच्या बांधांना पाणी वाहून नेण्यासाठी वेगळ्या खड्डयांची आवश्यकता नसते. बांधाचा पाया आणि जमीन ह्यांमध्ये बेंच प्रकारचा जोड असणे पुरेसे आहे. नाला बांध ज्या प्रवाहाला फारसा उतार नाही अशा ठिकाणी हे बांध घालता येतात. मात्र त्यासाठी निवडलेल्या जागेची माती जास्तीत जास्त सच्छिद्र व जाड थर असलेली असावी त्यामुळे कमी वेळात जास्त पाणी मुरविता येईल. असे बांध शक्यतो प्रवाहाच्या कडेने बांधले जातात आणि त्यांची उंचीदेखील २ मी पेक्षा कमी असते. जास्तीचे पाणी बांधावरून वाहू दिले जाते. त्या पाण्याने नुकसान होऊ नये म्हणून आधीच पुरेशी जमीन सोडुन द्यावी. एकाच प्रवाहावर अनेक ठिकाणी असे बांध घातले जाऊ शकतात आणि पाणी साठवले जाऊ शकते. अगदीच छोटा प्रवाह असेल तर चिकणमाती भरलेल्या गोण्यांनीदेखील काम होऊ शकते. काही ठिकाणी नाल्याचे पाणी बाहेर पडण्यास थोडीशी जागा ठेवावी व तेथे दोन्ही बाजूला ऍस्बेस्टॉसच्या शीटस लावाव्यात. बांधकामास मजबूती येण्यासाठी प्रवाहाच्या बाजूने सिमेंट व चिकणमाती भरलेल्या गोण्या ठेवाव्यात. संवर्धन पन्हाळे जेथे मातीची सच्छिद्रता कमी आहे तेथे ही पद्धत फारच उपयोगी आहे. हे पन्हाळे मजुरांद्वारे हाताने खोदले जाऊ शकतात. त्याचा व्यास साधारण २ मी पेक्षा मोठा असतो. हे पन्हाळे अच्छिद्र खडकात खोदून सच्छिद्र खडकापर्यंत पोहोचेल असे खोदावे. पाण्यापर्यंत पोहोचले नाही तरी चालते. हे पन्हाळे वाळू किंवा रेतीच्या साहाय्याने बांधावीत. ज्या गावात मोठ्या प्रमाणावर खडक आहेत अशा ठिकाणी हे पन्हाळे खुपच उपयोगी पडतात. असे आढळून आले आहे की ब-याचशा गावांत तलावामध्ये पुरेसे पाणी असते पण तेथील जमीन अच्छिद्र असल्याने ते पाणी शेजारच्या विहिरी, नाल्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे तलावातील पाणीदेखील वापर न झाल्याने वाफ बनून उडून जाते आणि पावसाळा संपला की कालांतराने हे तलाव आटतात. तलावांमध्ये अशी संवर्धन पन्हाळी बांधून हा प्रश्न सोडवता येतो. या पन्हाळ्यांमध्ये जास्तीचे पाणी साठवता येते. ही पन्हाळी ०.५ ते ३ मी व्यासाची व १० ते १५ मी खोल असतात. त्यांची रूंदी व खोली पाण्याच्या उपलब्धतेवर ठरविली जाते. पन्हाळाचे तोंड मात्र तलावाच्या जमिनीपासून जरा उंचावर ठेवले जाते आणि वाळूच्या साहाय्याने बांधले जाते. वरच्या १ ते २ मी खोलीपर्यंतचे बांधकाम दगडविटांनी केले जाते जेणेकरून बांधकामास मजबुती मिळेल. अशा पद्धतीने तलावातील जास्तीचे पाणी या पन्हाळ्यात साठून रहाते आणि ते पावसाळा संपल्यावरदेखील वापारता येते. बांधीव विहिरीतील संवर्धन अस्तित्वात असलेल्या किंवा वापरात नसलेल्या विहिरीदेखील साफसफाई करून, गाळ काढून याकामासाठी वापरता येतात. या पद्धतीत जमा केलेले पाणी एका पाईपच्या साहाय्याने विहिरीच्या तळाशी सोडतात. मात्र हे पाणी गाळमुक्त असले पाहिजे. यासाठी स्वच्छ वाहत्या पाण्याचा वापर करावा. तसेच पाणी गाळून विहिरीत जाईल अशी व्यवस्था करावी. पाणी निर्जंतुक करण्यासाठी क्लोरिनचा वापर करावा. भूजल बांध अथवा जमिनीखालील बांध हा बांध अर्धा जमिनीवर असतो आणि तो तळाशी वाहणारा प्रवाह अडवतो त्यामुळे ते पाणी वरच्या भागात साठवले जाते आणि आजूबाजूच्या सच्छिद्र खडकाचा जो भाग कोरडा असतो त्या भागात हे पाणी मुरते. ज्या ठिकाणी असा बांध बांधावयाचा त्या जागेत उथळ व मजबूत असा मातीचा/ खडकांचा सच्छिद्र थर असावा, रुंद खोरे असावे आणि पाणी जाण्यासाठी अरुंद जागा असावी. योग्य जागा निवडल्यानंतर, प्रवाहाच्या अच्छिद्र बाजूला व त्याच्या रुंदीला १ ते २ मी रुंदीचा खड्डा करावा. व तो जमिनीपासून सुमारे ०.५ मीपर्यंत दगडविटांनी बांधून काढावी. बांधामधून पाणी अजिबात वाहू नये ह्यासाठी ३००० PSI च्या व ४०० ते ६०० गेजच्या PVC शीटस किंवा २०० गेजच्या पॉलिथिन फिल्म वापराव्यात. पाणी बाजूच्याच सच्छिद्र खडकांमध्ये/ मातीमध्ये मुरून जाते त्यामुळे फारशी जमीन पाण्याखाली जात नाही आणि बांध घातल्यावरही तळ्याच्या वरची जमीन वापरता येऊ शकते. यात पाण्याचे बाष्पीभवन होत नाही किंवा त्यात गाळदेखील साचत नाही. शिवाय बांध फुटण्यासारख्या गोष्टीही टाळता येतात. शहरी भागात भूजलसंवर्धन करणे शहरी भागात पावासाचे पाणी मुख्यत्वे इमारतींच्या छतावरुन जमा करता येते. रस्ते आणि पदपथाखालची असलेली जमीन प्रामुख्याने वायाच जाते कारणे तेथे पाणी मुरवता येऊ शकत नाही. मात्र पावसाचे पाणी एखाद्या सच्छिद्र खडकात/ मातीत साठवून हवे तेव्हा वापरता येऊ शकते. मात्र पर्जन्यजलसंवर्धनाची यंत्रणा ही कमी जागेत मावणारी असावी. त्यापैकी छतावर बसवण्याच्या काही पद्धती खालीलप्रमाणे: संवर्धन खड्डा: ज्याठिकाणी गाळाची माती आहे किंवा सच्छिद्र खडक जमिनीलगत आहेत त्या ठिकाणी पावसाचे पाणी मुरवले जाऊ शकते. ज्या इमारतींना १०० चौ. मी. ची गच्ची लाभली आहे त्यांना ही पद्धत सोयीची आहे. हे खड्डे साधारणतः १-२ मी रुंद आणि २-३ मी खोल खणले जातात. हे खड्डे दगडांनी (५-२० सेमी) आणि जाड्या वाळूने भरले जातात. त्यामुळे पाण्यातील गाळ पृष्ठ भागावरच रहातो आणि सहज बाजूला करता येतो. कमी आकारमानाच्या गच्चीसाठी खड्डा फुटलेल्या दगडविटांनीदेखील भरता येतो. गच्चीतून खड्ड्यात सोडलेल्या पाईपच्या तोंडाशी गच्चीतच जाळी लावावी म्हणजे पाने किंवा इतर घन कचरा पाईपमध्ये अडकणार नाही. पाणी मुरण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी वाळूच्या थरावर अडकलेला कचरा/ गाळ नियमित साफ करावा. संवर्धन कालवा ज्या इमारतींचे छत २००-३०० चौ. मी. आहे आणि जमिनीमध्ये कमी खोलीवर सच्छिद्र थर उपलब्ध आहे तेथे ही पद्धत उपयोगी आहे. कालवा साधारण ०.५ – १ मी रुंद, १ – १.५ खोल, १० - २० मी लांब असावा. तो दगडविटा आणि जाड्या वाळूने भरावा. त्यामुळे पाण्यातील गाळ पृष्ठ भागावरच रहातो आणि सहज बाजूला करता येतो. गच्चीतून खड्ड्यात सोडलेल्या पाईपच्या तोंडाशी गच्चीतच जाळी लावावी म्हणजे पाने किंवा इतर घन कचरा पाईपमध्ये अडकणार नाही. पाणी मुरण्याचे प्रमाण कायम ठेवण्यासाठी वाळूच्या थरावर अडकलेला कचरा/ गाळ नियमित साफ करावा. पहिल्या पावसाचे पाणी खड्ड्यात न सोडता असेच वाहू द्यावे. ट्युबवेल जेथे आधीच ट्युबवेल आहेत अशा ठिकाणी ट्युबवेल वापरून खोलवर असलेल्या सच्छिद्र खडकांमध्ये पाणी मुरवता येते. १० सेमी व्यासाचे PVC पाईप इमारतीच्या गच्चीला लावून पावसाचे पाणी गोळा केले जाते. पहिल्या पावसाचे पाणी मात्र खड्ड्यात न सोडता असेच वाहू द्यावे. गच्चीतून खड्ड्यात सोडलेल्या पाईपच्या तोंडाशी गच्चीतच जाळी लावावी म्हणजे पाने किंवा इतर घन कचरा पाईपमध्ये अडकणार नाही. पहिल्या पावसानंतरचे पाणी T च्या साह्याने PVC फिल्टरमध्ये न्यावे. पाणी ट्युबवेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्याला फिल्टरमधून वाहु द्यावे. फिल्टर १-१.२ मी लांब PVC पाईपचा असावा. त्याचा व्यास छपराच्या क्षेत्रफळानुसार ठरवावा. उदा. १५० चौ. मी पेक्षा कमी जागेसाठी १५ सेमीचा, त्यापेक्षा जास्त असेल तर २० सेमीचा. फिल्टर दोन्ही बाजूने सुमारे ६.२५ सेमी कमी होईल या बेताने मापावा. PVC स्क्रीन वापरून फिल्टर तीन भागांत विभागावा त्या मुळॆ फिल्टरमधील साहित्य एकमेकांत मिसळणार नाही. पहिल्या भागात लहान गोटे (६-१० मिमी) भरावेत, दुस-यात मोठे गोटे (१२-२० मिमी) आणि तिस-यात त्याहून मोठे (२०-४० मिमी) गोटे वापरावेत. जर छप्पर फारच मोठे असेल तर फिल्टर करण्यासाठी खड्डा खोदावा. छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीवर असणा-या टाक्यांमध्ये साठवावे. या टाक्या एकमेकांना जोडलेल्या असाव्यात तसेच फिल्टर खड्ड्यालादेखील जोडलेल्या असाव्यात. त्यासाठी त्यांना १:१५ या प्रमाणात उतार असलेले पाईप वापरावेत. फिल्टर खड्ड्याचा आकार व आकारमान पाण्याच्या उपलब्धतेप्रमाणे ठेवता येते. त्यात गोटे तळाशी, मध्ये मोठे गोटे आणि सर्वात वर वाळू असा थर द्यावा. जाळी वापरून हे थर वेगवेगळे ठेवता येतील. खड्डा दोन भागांत विभागावा. पहिल्या भागात फिल्टरचे साहित्य भरावे आणि दुसरा भाग रिकामा ठेवावा जेणेकरून गाळलेले जास्तीचे पाणी त्यात साठवता येईल. हा खड्डा खालून पाईपने गाळलेल्या पाण्याच्या टाकीला जोडावा. संवर्धन विहिरीसह कालवा जेथे पृष्ठभागावरील माती अच्छिद्र आहे पण छतावरून मात्र मोठ्या प्रमाणावरून पाणी मिळू शकते तसेच जेथे थोडाच वेळ परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेथे ही पद्धत उपयोगी आहे. मात्र यासाठी सच्छिद्र मातीचा थार तीन मी च्या आत असणे आवश्यक आहे. १००-३०० व्यासाची गाळीव पाण्याची टाकी पाण्याच्या पातळीच्या किमान ३ ते ५ मी खाली खोदावी. १.५ – ३ मी रुंदीचा आणि १० - ३० मी लांब असा आडवा कालवा खोदावा आणि त्याच्या मधोमध टाकी खोदावी. टाक्यांची संख्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार वाढवता येऊ शकते. कालवा नंतर गोटे, दगड आणि वाळूने भरावा म्हणाजे टाकीत जाणारे पाणी व्यवस्थित गाळून जाईल. जर सच्छिद्र जमीन २० मी पेक्षा खोल असेल तर २ त ५ मी व्यासाचे व ३-५ मी खोल एक पन्हाळे बांधावे. त्यामध्ये १००-३०० मिमी व्यासाची टाकी बांधावी आणि त्याच्या तळाशी फिल्टर करणार्या वस्तू ठेवाव्या. स्त्रोत: जलसंसाधन मंत्रालय, केंद्रिय भूजल महामंडळ, फरिदाबाद